Tuesday, 24 January 2017

कुरकुरे-कुरकुरे

मी इथे या ब्लॉग वर का लिहीतो??  यावर एकच उत्तर म्हणजे मला लिहावंसं वाटतं म्हणून लिहितो!. एखाद्या पेपर मधे ब्लॉग बद्दल छापून यावं म्हणून काही लिहीण्याचा उद्देश नसतो माझा.
प्रतिवाद, तर्क, समर्थन किंवा संतुलन  वापरून लिहीणे  म्हणजे  लेखन असा माझा (गैर) समज होता, हे त्या बाहद्दराच्या प्रश्नाने सिद्ध केलेले आहे. ’डोके’ वापरून ’धड’ न लिहीण्याचा प्रयत्न केल्यावर काय जातय याकडे काही लक्ष नाही,  तेंव्हा आपल्याला जी काही गरळ ओकायची आहे ती ओकून , आणि आपल्या  अल्प मती वर बौद्धिक सृजनशीलतेची पुटं चढवून किंवा नसलेली सर्जनशीलता अंगी बाणवून काही तरी अगम्य लिहिणे, आणि एखाद्याचा अपमान करणे हा आपला  अधिकार आहे असा समज काही पंडितांना (बहाद्दरांना) झालेला आहे असे दिसते. 
           अशी वाक्य लिहायला फार अक्कल लागते असे नाही, पण  नाळ तुटल्या सारखी वाटते मातृ भाषेबरोबरची, आणि  कृत्रिम पणा पण येतो लिखाणात. कपाळ भिंतीवर आपटून घ्यायची इच्छा झाली होती.(मी अस कधी करेल का )         विचारांची बैठक, खंबीर पणा, आणि विस्तृत वाचनामुळे  “लेखनाला ” एक  योग्य वळण लागते. पण जर वाचन विस्तृत असेल आणि ’वैचारिक बैठक’ जर पक्की नसेल तर मग ’डोंबल’ लिहायचं.
            अशाच काही  ’स्वयंघोषित साहित्यिक पंडितांनी” काही वर्षापूर्वी पुलं, वपुं, सुहास शिरवळकर, चिंतामणी लागू वगैरे अनेक लेखकांना  साहित्यिक म्हणून अनेक वर्ष मान्यता दिलेली नव्हती. मध्यमवर्गीय संस्कृती वर लिहीतात म्हणून वपु वर पण खूप टीका करण्यात  यायची.  अर्थात त्यांच्या मान्यता न देण्याने, किंवा टीका करण्याने  काही फारसा फरक पडला असे नाही, जनतेने तर ह्या सगळ्या लेखकांवर आणि त्यांच्या लिखाणावर मनापासून प्रेम केले. याचं  कारण  एकच- ते म्हणजे त्यांच्या लिखाणात नेहेमीच साधीसोपी  आणि मनाला भिडणारी भाषा.
बाबुराव अर्नाळकरांनी  हजाराच्या वर रहस्यकथांची पुस्तकं  लिहिल्यावर सुद्धा त्यांना लेखक, साहित्यिक म्हणून आजही मान्यता दिल्या गेलेली नाही. अहो निरनिराळ्या विषयांवर हजारो रहस्यकथा लिहीणे म्हणजे काय चेष्टा नाही.  ही उदाहरण देण्याचा अर्थ मी स्वतःला साहित्यिक वगैरे समजतो आहे असे नाही- तर ह्या टीकाकारांच्या टीकांकडे लोकं लक्ष देत नाहीत हे सांगणे आहे.
मी स्वतः विचार केला की मला वाचायला काय आवडेल? रंजनात्मक, ज्ञानात्मक की माहिती पूर्ण ? स्वतःच विचार केल्यावर “मला जे काही माहिती नाही ते मला वाचायला आवडेल” – मग ते कुठल्याही प्रकारचे लेखन असले तरीही चालेल. हा ब्लॉग  लिहित असतांना  मी हेच तत्व पाळून मला स्वतःला जे काही आवडेल तेच लिहत आलो आहे..
काही लोकांना प्रत्येकच गोष्टीला नावं ठेवायची सवय असते. मग तो एक प्रकारचा स्वभावच होतो . प्रत्येकच गोष्टी बाबत कुरकुर करण्याचा स्वभाव.  असं पहा (म्हणजे उदाहरण), सकाळी बायकोने मस्त चहाचा कप समोर आणला, आणि नेमकी साखर कमी झाली… यावर कुरकुरे महाशय नक्कीच ” काय हे? इतकी वर्ष झाली लग्नाला, तरीही चहा करता येत नाही का तूला” म्हणून कुरकुर करत चहाचा कप समोर धरेल. बायकोने टाकलेली एक चमचा साखर अगदी चहा थंड होई पर्यंत ढवळेल, आणि मग पुन्हा चहा गार झाला म्हणून कुरकुर करत बसेल..
याच परिस्थिती मधे दुसरा एखादा म्हणजे (नॉन कुरकुरे) मात्र बायकोला समोर बोलावून, एक घोट घे गं चहाचा, म्हणजे पुरेसा गोड होईल म्हणून बायकोला सांगेल.. चहाकडे पाहून बायको हसली,किंवा तिने एक घोट घेतला  की चहाची गोडी वाढेल असं म्हंटल्यावर बायकोला पण चहात साखर कमी झालेली आहे हे समजेल, आणि  तिचा पण मुड खराब होणार नाही. जीवनातला आनंद जर टिकवून ठेवायचा असेल तर कुरकुर करणे सोडणे, आणि जगात अस्तित्वात असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे एवढे केले तरीही पुरेसे आहे. (काही प्रसंग ऐकले,पहिले म्हणून नवरा बायकोचे उदाहरण दिले.)
माझा अनुभव असा आहे, जे  ’लुझर्स ’आहेत ते कुरकुरे असतात. असाच एखाद्या कुरकऱ्या जेंव्हा जेंव्हा संधी मिळते तेंव्हा त्याच्या ह्या कुरकुरीत स्वभावाचे यथार्थ दर्शन त्याच्या अगम्य आणि जडजंबाळ शब्द वापरून बोलण्यातून घडवतो.
कुठल्याही गोष्टीला चांगलं न म्हणता येणं  हा यांचा दोष असला तरीही त्याला आपला गुण समजतात. एखाद्या गोष्टी मधे वाईट काही सापडले नाही तर हे लोकं अस्वस्थ होत असावे.स्वतःबद्दल उगाच काहीतरी भ्रामक कल्पनांचा डॊंगर डोक्यात घेऊन हे समाजात वावरत असतात.” बहुतेक प्रत्येक चांगल्या गोष्टी मध्ये वाईट काय आहे, हे शोधायचं,आणि मग त्या बद्दल  कुरकुर करत रहायचं” असा स्वभाव असतो यांचा.  पेसिमिस्ट+सॅडीस्ट अशा प्रकारच्या  (अव)गुणांचे कॉंबीनेशन म्हणजे हे कुरकुरे.
एक कविता होती, गोविंदाग्रजांची , चिंतातूर जंतू नावाची. त्या कविते मधे गोविंदाग्रजानी अशा कुरकुऱ्या लोकांची मस्त उडवलेली आहे, ” सूर्याचे तेच उजाड उघड्या माळावर उगाच सांडते, ते बघवत नाही” असं म्हणणाऱ्या कुरकुऱ्याला ते म्हणतात, “मग डॊळे फोडून घेच गड्या”.
जेंव्हा तोच कुरकुऱ्या म्हणतो, झाडावर एवढी हिरवी पानं उगाच निर्माण केलीत, त्यांचं मातित पडल्यावर काय होत असेल? तर यावर गोविंदाग्रज म्हणतात, ”जा मातीत मिसळुनी पाही ”
”निंदकाचे घर असावे शेजारी”  म्हणतात,  म्हणूनच कुरकुऱ्याच्या निंदाजन्य उल्लेखावरून चांगलं काय ते घ्यायचं असा विचार केला तर एक गोष्ट लक्षात आ्ली, की  आपला ब्लॉग  कसाही असला तरीही दुर्लक्ष करण्यासारखा निश्चितच नाही, “लव्ह मी ऑर हेट मी, यु कान्ट इग्नोअर मी”! 
                       
     #तुमचा दिप्या

8 comments: