Wednesday, 11 January 2017

संविधान सभेतील मोहंमद अली जिना यांचे भाषण

"कायदे आझम" नावाच पुस्तक आहे हे मला माहितीच नव्हतं असेच एक दिवस माझी मैत्रीण तेजाली हिच्या कडे ते पहिले आणि ती आमच्या विभागाच्या ग्रंथालयात परत करण्यासाठी जात होती. तेव्हा मी तिच्याकडून हे आनंद हर्डीकर लिखित ४३१ पानांचं पुस्तक घेतले आणि वाचनाला लागलो. त्यातून लेखणी काय स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून हा लेख आपल्यापुढे मांडत आहे. 
      हिंदू समाजव्यवस्था व मुस्लीम समाजव्यवस्था फार वेगळ्यावेगळ्या आहेत असे समजण्याचे कारण नाही.
                       न्याय, सकारात्मकता ही आपली तत्त्वं
                          कायदे आजम मोहम्मद अली जीना.
आपण मला दिलेल्या आदर  सत्काराबाबत मी आपला मनापासून आभारी आहे. घटना समितीने माझी प्रथम राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली  गौरव केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझ्याबद्दल ज्यांनी ज्यांनी कौतुकाचे बोल काढले आहेत, त्यांचादेखील मी आभारी आहे. मला प्रखर आशावाद आहे की, आपल्या सर्वांच्या अनुमतीने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही घटना समिती संपूर्ण जगासाठी एक उत्तम उाहरण ठरेल. घटना समितीला महत्त्वाची दोन  कामे प्रामुख्याने करायची आहेत. प्रथम अग्रणी  असलेले काम म्हणजे पाकिस्तान देशासाठी संविधाननिर्मिती आणि दुसरे काम म्हणजे पाकिस्तान संघराज्याचे प्रशासन व्यवस्थितपणे चालवण्याचे काम. पाकिस्तान संघराज्याचे संविधान बनविताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्हांला ही गोष्ट माहीत पाहिजे की, एकाच द्वीपखंडातील दोन देश  एकमेकांपासून विभक्त होत आहेत. आपणच नाही तर संपूर्ण जग या घटनेकडे कुतूहलाने, आश्चर्याने बघत आहे. ही एकमेवाद्वितीय घटना आहे. जगात कुठेही आजवर घडली नसेल अशी ही घटना आहे. मुख्य म्हणजे क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण शांततेने हे मिळविले आहे. संविधाननिर्मितीच्या बाबतीत काय काय केले  पाहिजे याबद्दल या ठिकाणी मी काही भाष्य करणार नाही, परंतु हे सांगू इच्छितो की, तुम्ही सर्व एका सार्वभौम देशाच्या वैधानिक व्यवस्थेचा भाग आहात, तुम्हांला या वैधानिक व्यवस्थेने काही अधिकार दिलेले  आहेत. त्यामुळे तुम्ही काय निर्णय घ्याल व कसे घ्याल हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना याबाबतीत जबाबदारीने वागावे लागणार आहे, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. एका मुद्द्यावर आपण सगळे सहमत असलो पाहिजे की,देशात कायदा  व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी  आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन, मालमत्ता, धार्मिक स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे आपले आदिम कर्तव्य असायला हवे.
दुसरी एक गोष्ट आपणांस सांगू इच्छितो की, सध्या अखंड भारत देश  एका भयंकर शापाने प्रभावित आहे. तो शाप म्हणजे लाचखोरी आणि भ्रष्टाचार होय. इतर देशांना  हा शाप नाही असे नाही. परंतु आपली स्थिती इतर देशांपासून फारच बिकट आहे. लाचखोरी व भ्रष्टाचार हे विष आहे. त्यांच्याशी आपल्याला दोन  हात करावे लागतील. मला आशा आहे की, आपण सगळे या विषयाची गांभीर्याने दखल घ्याल आणि या विषाचे आपल्या देशातून उच्चाटन कराल.
काळा बाजार हा आणखी एक शाप आहे. आपल्याला माहीत आहे की काळा बाजार करणारे लोक फार कमी प्रमाणात पकडले जातात आणि त्यांना शिक्षा केली  जाते. काळा बाजार हा भयंकर राक्षस असून, आपल्या समाजात तो हैदोस घालतो आहे. त्यामुळे आपल्याला अन्नाधान्याच्या टंचाईला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने दखल घेत, कठोरातले कठोर कायदे आपण बनवले पाहिजे.
पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी वारसाने मिळालेल्या आहेत. जशा चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत तशा वाईट गोष्टीे देखील आपल्याला वारशाने मिळालेल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे नोकरशाही आणि तिचा भ्रष्ट कारभार. याठिकाणी मला हे प्रकर्षाने अधोरेखित करायचे आहे की, नोकरशाहीचा मनमानी कारभार मी खपवून घेणार नाही. जिथे कुठे  मला असे चित्र दिसेल  तिथे मी कडक कारवाई केल्यावाचून  राहणार नाही.
मला माहीत आहे की काही लोक फाळणीबद्दल, पंजाब आणि बंगालच्या विभाजनाबद्दल खूश नाहीत. बर्याच लोकांनी आपली नाराजी बोलूनसुद्धा दाखवली आहे. परंतु आता जी परिस्थिती आपल्यासमोर आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. मी मागे म्हटल्याप्रमाणे एकाच द्वीपखंडातील भूभागाची ही फाळणी न भूतो न भविष्यती अशीच आहे. काही लोकांना हेखील आवडलेले नाही की एकाच समुदायातील दोन  घटक वेगळेवेगळे झालेले आहेत. जिथे एक समाज बहुसंख्य आहे तर दुसरा अल्पसंख्याक आहे.
अल्पसंख्याक व बहुसंख्याक यांना घेऊन काम करता येईल की नाही हा प्रश्न लोकांकडून फाळणीच्या अगोदर  विचारला जात होता. आता फाळणी झालेली आहे, आपण विभक्त झालेलो आहोत. मागचे सोडून देत  आपण ती परिस्थिती स्वीकारायला हवी. मला पूर्ण खात्री आहे की, येणार्या काळात आपण घेतलेला निर्णय फायद्याचा  ठरणार आहे. अखंड भारताची संकल्पना कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. अखंड भारताची संकल्पना ही विनाशाकडे नेणारी संकल्पना आहे. या संकल्पनेचे पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल. सोबत एकाच देशात एक समाज प्रभावशाली असणं आणि दुसरा  समाज अल्पसंख्याक असणं हे संयुक्तिक नाही. त्यामुळे आपण फाळणीचा विचार केलेला  होता, तो आता पूर्ण झालेला आहे. पाकिस्तानचे हे विशाल साम्राज्य जर आपल्याला सुखी व समाधानी ठेवायचे असेल तर आपल्याला आपल्या नागरिकांवर लक्ष केंद्रित  करावे लागेल. मुख्यत्वेकरून गरीब जनतेकडे लक्ष दिले पाहिजे. आपण सहकार्याने काम केले , भूतकाळाकडे दुर्लक्ष केले  तर आपल्याला विजय नक्की मिळेल. आपल्याला आपला भूतकाळ विसरून काम करायचे आहे, आपल्या सगळ्यांमध्ये तो उत्साह असला पाहिजे. तेव्हा व्यक्ती कुठल्या  धर्माची आहे, जातीची आहे, रंगाची आहे हे न पाहता आपण काम केले पाहिजे . दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार, असणार आहे. असे असले तरच आपण विकास करू शकू.
हिंदू  समाजव्यवस्था व मुस्लीम समाजव्यवस्था फार वेगळ्यावेगळ्या आहेत असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिमांमध्येखील आपल्याला पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी असे पंथ पाहायला मिळतात तर हिंदू समाजात ब्राह्मण, वैष्णव, खत्री, बंगाली, मद्रासी अशा जाती पाहायला मिळतात. हे सगळं संपायला हवं, संपेलही. कोणी म्हणेल की, या व्यवस्थेमुळे भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यात अडथळा आला, म्हणून आपण देखील  या सगळ्या गोष्टी फार अगोदरच सोडायला हव्या होत्या.
फार काळ कोणी तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकत नाही. 40 करोड लोकसंख्या असलेल्या देशावर  तर नाहीच नाही. आपण पारतंत्र्यात होतो तरी फार काळ आपण त्यांच्या गुलामगिरीत राहू शकलो नाही. आपण यापासून योग्य तो धडा घ्यायला हवा. तुम्ही आता मुक्त आहात. तुमच्या मंदिरांमध्ये  जाण्यास तुम्ही मुक्त आहात. तुमच्या मशिदींमध्ये जाण्यास तुम्ही मुक्त आहात. या पाकिस्तानात हवे तेथे आपले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे तुम्हांला स्वातंत्र्य आहे. तुम्ही कुठल्याही वंशाचे असाल किंवा  धर्माचे असाल, तुमच्या स्वातंत्र्यात अधिकारात पाकिस्तानचे सरकार ढवळाढवळ करणार नाही.
तुम्हाला माहिती असेल की, इतिहासात नोंद आढळते की सध्याच्या भारताची परिस्थिती बघता इंग्लंडची परिस्थिती त्याहून दयनीय  होती. रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे ख्रिश्चन धर्माचे दोन  मुख्य पंथ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. आतासुद्धा इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक  यांच्यात भेदभाव राखला जातो. ईश्वराचे आभार मानले पाहिजेत की अशा विषमतेच्या काळात आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही. आपण सुरुवात केली आहे, जिथे समानता आहे, जिथे धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, वर्णाच्या आधारावर कुठेही विषम वागणूक दिली जात नाही. सर्व नागरिक समान आहेत या तत्त्वावर आपण आपल्या देशाची  उभारणी करत आहोत. रोमन कॅथलिक व प्रोटेस्टंट यांच्यातील वादविवाद  मिटवण्यासाठी इंग्लंड सरकारला बराच कालावधी लागला. अनुभवातून हा देश  शिकला व सध्या सर्वांना समान हक्क, समान नागरिकत्व इंग्लंडमध्ये दिले जाते. प्रोटेस्टंट असो किंवा  रोमन कॅथलिक सर्व पंथाचे लोक तेथील नागरिक आहेत. मला वाटते आपण हा आदर्श  घ्यायला हवा. या देशातील  मुस्लीम हे मुस्लीम म्हणून ओळखले जावेत,हिंदू हे हिंदू  म्हणून ओळखले जावेत, केवळ धार्मिक कारणासाठी नाही तर ते या देशाचे नागरिक आहेत व आपले धार्मिक आचरणाचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे सांगण्यासाठी आपण तसे केले पाहिजे. असो, मी तुमचा फार वेळ घेणार नाही. मला दिलेल्या  मानाबद्दल, गौरवाबद्दल तुमचे पुन्हा आभार मानतो. मी कायम न्यायाला आणि सकारात्मकतेला आपले तत्त्व मानले आहे.
मी सुचवलेली मार्गर्शक तत्त्वे न्यायाच्या बाजूने आणि अन्यायाच्या विरोधात असतील असे मी ठामपणे सांगू इच्छितो.
Reference: Constituent Assembly Debates.
पूर्व प्रसिद्धी : लोकमुद्रा मासिक, ऑगस्ट 2016

No comments:

Post a Comment