भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर अत्यंत असंवेदनशील आणि अवहेलनात्मक भाषेत केलेले विधान अवघ्या महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे. एका शेतकऱ्याच्या घराण्यात जन्म घेतलेले दानवे यांच्याकडून असल्या विधानाची अपेक्षाही करवत नाही. आता दानवे यांनी मानभावीपणा दाखवत या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी `बूंदसे गयी वो हौदसे नही आती’ हेच खरे. `एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात…` असे विधान दानवे यांनी, जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले. हे वक्तव्य करताना रावसाहेब दानवेंनी असभ्य भाषेचा वापर केला होता. महाराष्ट्रात सध्या तूर खरेदीच्या प्रश्नावरून हवा तापलेली आहे.
यंदा राज्यात तूर उत्पादन विक्रमी झाले आहे, त्यातच नाफेडने तुरीच्या खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने या केंद्रांबाहेर शेतकऱ्याची तूर पडून आहे. जी तूर खरेदी वेळेत झाली तीही शेतकऱ्याकडून न होता व्यापाऱ्यांंकडून झाली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खान्देश भागातील तूर उत्पादक शेतकऱ्याची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहिर अशी झाली आहे. यातून मार्ग काढण्याऐवजी शेतकऱ्यांना क्लेश होईल अशा भाषेत त्यांची संभावना दानवे यांनी केल्यामुळे सरकारी पक्ष शेतकऱ्याविषयी किती सहानुभूती बाळगून आहे, हे स्पष्ट होते. `कापूस, तूर आणि डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा’, असा `सल्ला’ही रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांना दिला आहे. अर्थात, भारतातील राजकीय परंपरेनुसार केलेल्या विधानापासून माघार घेणारे दानवे हे काही पहिले नेते नाहीत. शेतकर्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील वक्तव्य केल्यानंतर टीकेचे धनी ठरलेले दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
शेतकर्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. शेतकर्यांचे दुःख मला माहिती आहे. त्यामुळे मी कधीही अपशब्द वापरू शकत नाही, असे दानवे म्हणाले. जालना येथील बैठकीत एका कार्यकर्त्याने तुरीचा प्रश्न उपस्थित केला होता. `माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. शेतकर्यांची बाजू घेत मी 35 वर्षे राजकारणात आहे. माझ्या आणि कार्यकर्त्यांमधील संवादाला शेतकर्यांशी जोडू नये. त्यानंतरही शेतकर्यांची मने दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो’, अशा शब्दांत दानवेंनी खेद व्यक्त केला. दानवेंच्या या वक्तव्यानंतर शेतकरी आणि विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही टीका केली होती. दानवेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली होती. सोशल मीडियावरही दानवेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला जात होता. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रावसाहेब दानवे पदावर राहणे हे विरोधकांच्याच फायद्याचेच आहे, असे सांगत दानवेंना खोचक टोला लगावला. विरोधकांनी दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करू नये. कारण दानवेंच्या अशाप्रकारच्या वक्तव्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल, असे पवार म्हणाले.
तर धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला माफ करता येणार नाही, आम्ही याचा निषेध करणार असून राज्यात त्यांचे फिरणेही मुश्कील करु असा इशाराच दिला आहे. दानवेंचे वक्तव्य राज्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारे आहे. या वक्तव्याने सत्तारुढ भाजप नेत्यांच्या मनातील शेतकर्यांबद्दलची खदखद बाहेर आली असे मुंडे म्हणाले. राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. तूर उत्पादक शेतकरीही दर कोसळल्याने त्रस्त झाले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी हवालदील झाला असताना दानवेंनी बेजबादार, अपमानास्पद विधान करुन शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विरोधी पक्ष तसेच शेतकर्यांच्यावतीने रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला, तो स्वाभाविकच म्हणायला हवा. बेतालपणे बोलण्याची दानवे यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, विदर्भ, मराठवाडय़ात दुष्काळ नसतानाही दुष्काळाचे खोटे चित्र उभे करुन शेतकर्यांना मदत दिल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. शेतकर्यांना कर्जमुक्ती हवी असेल
तर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशी हमी द्यावी असे विधान केल्याने रावसाहेब दानवेंवर यापूर्वी खरमरीत टीका झाली होती. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बोलताना दानवे यांनी, `तुमच्याकडे नोटा असतील तर माझ्याकडे दय़ा, मी नोटा बदलून देतो’ असे विधान केले होते. पैठणमधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी `मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्या रात्री लक्ष्मी घरी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा’, असे वादग्रस्त विधान केले होते. शेतकर्यांबद्दल अशाप्रकारे विधाने करून राज्यकर्त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने एकंदरीतच सरकार या प्रश्नाबद्दल किती गंभीर आहे याचाच पुरावा दिला आहे. शेतकर्यांची कर्जमाफी हा मुद्दा विरोधकांनी हाती घेतला असताना सत्ताधारी पक्षातर्फे त्याला योग्यप्रकारे प्रतिवाद करण्याऐवजी दानवेंसारखे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले नेतेच अशी चक्रमसारखी बडबड करीत असतील तर राज्यातील शेतकर्यांचे भवितव्य काय असू शकेल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज उरणार नाही.
तुमचा
दीपक कठाळे
तुमचा
दीपक कठाळे


No comments:
Post a Comment