Friday, 3 February 2017

सह्याद्रीचा मुकूटमणी "हरिश्चंद्रगड"

                                                  
एक तपोभूमी, भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुटमणी ही सगळी विशेषणं कुणासाठी वापरली जातात, असा प्रश्न विचारला, तर हरिश्चंद्रगड हे एकमेवाद्वितीय नाव समोर येतं. भटक्या मंडळींनी हरिश्चंद्रगडाची वारी कितीही वेळा केली तरी ती पूर्ण होतच नाही... आपण तो पूर्ण अनुभवला नाहीच, अशी भावना सतत मनात येत राहाते.
कित्येक उपमा, उपाध्या मिरवणारा हरीश्चंद्रगड. अर्थात, त्या सर्वच उपाध्या सार्थच म्हणाव्यात, किंबहुना कमीच पाडव्यात असाच आहे हा गड. इतका सुंदर, इतका मोहक, की एकदा भेट देणारा मनुष्य पुन्हा आला नाही, असं होणं केवळ अशक्य. माझ्यासाठी तर हा किल्ला नविनच होता कारण कधी गेलोच नव्हतो जवळ असून सुद्धा. आणि एकदा असच आमचे गुरुवर्य श्री.रमेश खरमाळे यांच्या बरोबर जाण्याचा योग आला एकाच वर्षात दोन वेळा पाहून झालेला आणि त्याची कथाही तशीच सुरस.      

हरिश्चंद्र गड  केवळ सिनेमा, फोटो यांतून आणि माळशेजमधून येता-जाताच पाहाण्याचा योग आला. म्हणूनच  सरांनी आखलेल्या नियोजित ट्रेकिंगला जायचे ठरवले. आम्ही  'सह्यवेडे ' होतो 11 आणि आमचे मोरक्या होते श्री.खरमाळे सर आणि बाकीचे आम्ही टोळी मेंबर.
                                     
श्री.रमेश खरमाळे (माजी सैनिक)        
जन्म-13 नोव्हेंबर 1976 
सैन्यातून सेवानिवृत्ती -1 मे 2012 
सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात कार्यरत आहेत. 
निसर्गरम्य जुन्नर तालुका या सोशल मीडिया पेज चे सर्वेसर्वा आहेत.
तसेच ते शिवाजी ट्रेल व दुर्ग संवर्धन समिती चे सदस्य आहेत 
तसेच किल्ले शिंदोळेचे किल्लेदार (समन्वयक) आहेत.
जुन्नर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक लेख ते फेसबुक सारख्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देतात.
काही दिवसांपूर्वी जुन्नर मधील किल्ले हडसर येथे पुण्याचे काही पर्यटक रात्रीच्या वेळी अडकले होते.त्या पर्यटकांना सुखरूप योग्य ठिकाणी आणण्यासाठी श्री.खरमाळे यांनी मोलाचे कर्तव्य बजावले होते. 
जर कोणाला जुन्नरचा निसर्ग अनुभवायचा असेल तर खरमाळे सर ट्रेकिंग कॅम्प नेहमी आयोजित करत असतात.
त्यांचा संपर्क- 8390008370/9420610358 
    दुचाकी असल्याने सैराभैरा पाहता येत होत.(निसर्ग पाहायला टॅक्स लागत नाही ना)वाटेत झरे, नदी, खडी चढण, जंगल सारं अनुभवत आम्ही साधारण काही तासात केदारेश्वर मंदिरापाशी आलो. इथे मंदिरं, गुहा मोठ्या प्रमाणात आहेत; कारण हरिश्चंद्रगड ही तशी प्राचीन तपोभूमी आहे. नंतर माळशेज घाट आणि बाकी परिसरावर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग झाला. मंदिरापाशी आम्ही पोहोचलो, आता ओढ लागलेली ती हरिश्चंद्रगडाच्या सर्वांत मोठ्या आकर्षणाची... कोकणकड्याची.

झरझर आम्ही टेकड्या ओलांडत होतो.काळोख सरसावत
होता.आम्ही खूप पुढे आलो होतो(सर,तान्हाजीभांगले(डॉक्टर),आकाश,प्रदीप,प्रसन्ना, आणि मी) आणि बाकीचे जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी म्हणजे आमचे सहकारी पाठीमागेच राहिले होते त्यांना आणायला मी,प्रदीप,आणि सर पुन्हा मागे गेलो.सर्व रुग्णसेवक सहकारी आम्हाला भेटले त्यांना घेऊन आम्ही निच्छित स्थळी पोहोचलो.आम्ही निवाऱ्यासाठी गुहा शोधात होतो. मेजवानी ची सर्व तयारी झाली होती.फक्त पुढे यायची वाट पाहत होतो. त्याआधी आम्ही हरिश्चंद्र मंदिराकडे असणाऱ्या कुंडात फ्रेश होण्यासाठी गेलो. (सर,मी,प्रदीप,प्रसन्ना,आणि डॉक्टर)
कुंडात उतरण्याच्या आधी सरांनी मला आणि प्रदीप,प्रसन्ना ला सांगितलं कि ह्या कुंडातल्या महादेवाच्या पिंडाला 21 प्रदक्षिणा घातल्या कि मनातली इच्छा पूर्ण होते.
विचार न करता रात्रीचे 11.30- 12 वाजले असतील. आम्ही तिघांनी 21 प्रदक्षिणा चालू केल्या. बाप रे इतकं थंड पाणी होत कि विचारू नका. (अजब म्हणजे पाणी कंबरे पर्यंतच असते.) आणि मला तरी कंबरे खाली थंड पाण्याने बधिरपणा जाणवत होता. अर्थात प्रदीप आणि प्रसन्ना त्यांचेही हे हाल असतील.एकमेकाला सांगूही शकत नव्हतो का तर जप चालू होता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
माझा मात्र दंतताल चालू होता आणि मध्ये सरांच्या नावाने शि(व्या)वाय हा जप करत होतो. सर मात्र बाहेर बसून आमची गम्मत पाहत होते मग तर अजून त्यांच्या नावाने जप चालू होता.
आमच्या प्रदक्षिणा झाल्या. वीस मिनिटं कमरेखालचा भाग आहे हे मी तरी ठाम सांगू शकत नव्हतो. पुढे आम्ही हरिश्चंद्र मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी गेलो. दर्शन छान झालं.तोपर्यंत डिनर ची तयारी बाकीच्या सहकार्यांनी करून ठेवली होती. मस्त छान असा डिनर झाला आणि आम्ही त्या गुहेत झोपण्याच्या तयारीला लागलो. मस्ती ,जोक्स , सांगत आम्ही झोपी गेलो. मी सर्वात कडेला झोपलो माझ्या शेजारी सर त्यांच्या शेजारी डॉक्टर ,प्रदीप,प्रसन्ना,आणि सर्व बाकीचे सहकारी त्यातले ग्रामीण रुग्णालयाचे एक सहकारी खूप आवेशात बोलले जर साप निघाला तर मला सांगा.आम्ही सर्व त्यांच्या भरवशावर झोपी गेली.
लिहताना सुद्धा अंगावर काटा येतोय माझ्या शेजारून एक साप जातोय हे सरांना जाणवलं त्यांनी मला न उठवता डॉक्टरांना उठवलं . मी मात्र स्वप्नाच्या दुनियेत रंगलो होतो.माझ्या पासून त्याला लांब करण्यात सरांना आणि डॉक्टरांना यश आलं. लगोलाग त्यांनी बाकीच्या सहकाऱ्यांना उठवलं. आणि मला उठवलं .....दिप्या उठ , साप बघ माझी झोपच गायब मी खाडकन उठून बसलो. त्यांनतर त्या महाशयांना उठवलं ज्यांनी कमेन्टमेंट केली होती साप आला कि मला उठवा त्यांना उठवलं.ते आरामशीर उठले सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला पण सर्वांचे डोळे लगेच मोठे झाले त्यांच्या एका वाक्याने मी कधी म्हंटल मला साप पकडता येतो मी तर म्हंटल साप आला कि मला उठवा आणि मित्रांनो साप आला तुम्ही मला उठवलं त्या बद्दल धन्यवाद.
सर्व जण हसत होते मी मात्र खोट खोट हसत होतो.
सरांनी साप काठीवर धरला आणि लांब सोडून आले. सर्व जण झोपले पण झोपायचं नाटक केलं तुम्हीच सांगा कशी झोप येईल. 
सकाळ झाली सर्व उठलो . मस्त शेकोटी केली चहा घेतला आणि फ्रेश झालो. या काळात सरांची तब्बेत बिगडली त्यांनी माघारी जायचा निर्णय घेतला. सर आणि डॉक्टर परतीच्या वाटेवर लागले. आम्ही पुढे लक्ष्य ठेवले होते




कोकणकडा आणि तारामतीचा कडा.....कोकणकड्यावर बसून मस्तपैकी वारा अंगावर घेण्यात काही आगळीच मजा. जवळपास ३००० फूट उंच कडा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पोखरला गेलाय आणि चांगलाच बाकदार झालाय. याच कड्याच्या उजव्या बाजूने एक नळीची वाट किल्ल्यावर येते.आमच्यातल्या एका सहकार्याने 'आस्तेकदम.....आस्तेकदम...' शिवरायांची वर्दी द्यायला सुरवात केली.त्यांनतर संपूर्ण कड्यात "राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो...."अश्या घोषणा घुमू लागल्या. तेव्हा कोकणकड्यातून येणार प्रतिध्वनी केवळ अनुभवायचीच गोष्ट.त्यातून तो जर शिवरायांचा गजर असेल तर नादच नाही.
आम्ही कोकणकड्यावर जास्त वेळ न घालवता.तारामतीच्या कड्याकडे मार्गक्रमण चालू केले आणि दुपार पर्यंत आम्ही तारामतीच्याकड्यावर पोहचलो होतो. सुर्यास्ताच्या आधी गडाच्या खाली पाहिजे असा निर्धार केला आणि परतीच्या वाटेवर लागलो.
या सर्व भटकंतीत गप्पांचा फड रंगला. प्रत्येकाचे अनुभव, कथा, विनोद असं सगळं जिथे टाईम भेटल तिथे होत होतं
लांबूनच पुन्हा एकदा महादेवाला हात जोडले आणि इथेही पुन्हा जाणवलं. गडावर कचरा अमाप झालाय. पुन्हा येताना याच्या निर्मूलनाचा कार्यक्रम घेऊन यायला हवं, या साऱ्या गोष्टींचा विचार करत. इथून पुढे सर्वांचाच वेग वाढलेला होता. आता घर खुणावत होतं. खाली पोहोचून मागे वळून पाहिल्यावर 'राहिलो असतो आणखी एक दिवस,' असं वाटत राहिलं. 
जुन्नर मध्ये पोहोचल्यावर प्रत्येकजण वदला, 'सर, पुन्हा जायचंच. तारीख बोला फक्त.' याचं कारण एकच, कितीही वेळा जा, कितीही फिरा, हरिश्चंद्रगड 'पूर्ण' होतच नाही..

तुमचा दिप्या  

No comments:

Post a Comment