Thursday, 8 March 2018

आजची 'ती'



आई, बाबा मला मारु नका. मला जगायचंय. मी तुमचीच मुलगी आहे. मग, मला असे दूर का लोटता ? हे हृदयाला पाझर फोडणारे उद्गार अहेत. स्त्री पिंडाचे ( स्त्री भ्रूणाचे) आपण २१ व्या शतकात पदार्पण केले.  विज्ञान-तंत्रज्ञानासारख्या उच्च क्षेत्रात प्रगती केली, पण आजही आपले विचार निच दर्जाचे आहेत.
श्री.जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली .....
“मी आंतून बोलते आहे” ही कविता खूप बोलकी आहे. जन्माला येण्यापूर्वीच खुडली जाण्याची भीती वाटत असलेल्या स्त्रीजीवाचे आक्रंदन त्यात आहे. तिने असा आक्रोश केला आहे …
“सारा निसर्ग पिसारा, इवल्याशा, डोळ्यांत भरून घ्यायला मी उत्सुक आतुर अधीर!
मग माझ्या जन्मदात्यांचा मेंदू, का बधिर?
पुरुषाला स्त्री हवी, ही सुसंगती तरी माता पित्याला मुलगी नको, ही विसंगती!
कां, का?
जन्माला येण्यापूर्वी माझ्या नरडीला नख लावणारे हे माझे मारेकरी.. जल्लाद!
आईवडिलांच्या रूपांत सल्ला घेताहेत, विज्ञानाचा! …..
मी आतून बोलते, आईच्या कुसण्यातून! मला बाहेर येऊ द्या. मला बाहेर येऊ द्या!” ….
स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्यातर असे पाहण्यात येत आहे की, दुसरे अपत्य असलेल्या (?) मुलींची संख्या ( १००० मुलांचे ) मागे ७५९ आहे. तर प्रत्येक हजार पुरुषांमागे १९९१- ९४५
तर २००१ – ९२७ स्त्रियांची संख्या आहे.
खरे पाहिले तर या जगाच्या रथाची दोन चाके म्हणजे स्त्री आणि पुरुष. हा रथ व्यवस्थितपणे चालवायचा असेल तर दोन्ही चाके सारख्याच गतीने चालण्यासाठी स्त्री रुपी चाकाला सक्षम बनविणे अत्यावश्यक आहे. स्त्री स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ असली पाहिजे. खेड्यातच काय पण अगदी शहरात सुद्धा संध्याकाळी साडे सहा-सात वाजता बाजूच्या दुकानात जायचे तरी १८ वर्षाच्या बहिणीबरोबर ९-१० वर्षाच्या भावाला पाठविले जाते. जोपर्यंत स्त्री अशी रक्षणीय मानली जाईल, तोपर्यंत तिला स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणता येणार नाही.
लेकीचा ग जलम । भाड्याचा बईल
कधी इसावा हुईल । देवा ठावं
लेकीचा ग जलम । देव देऊनी चुकला
बैल घाण्याला उपला । जलमभरी
या ओळीतूनच भारतीय स्त्रीची, विशेषतः ग्रामीण स्त्रीची किती दुरवस्था झाली आहे हे स्पष्ट होते.
स्त्रीवर होणाऱ्या या सर्व अत्याचाराचे तिच्या दुःस्थितीचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. संपूर्ण मानवजातीच्या विकासासाठी मुलींच्या शिक्षणाइतके परिणामकारक दुसरे साधन नाही. एका मुलीला शिकवणे म्हणजे अख्या कुटुंबाला शिकविण्यासारखे आहे. स्त्रियांपुढे गंभीर समस्या आहेत, पण शिक्षण या जादूच्या कांडीने सोडविली जाणार नाही. अशी एकही समस्या नाही. त्यासाठी समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. स्त्री ही त्याग नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही. पारंपारिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे आता महिला काबीज करीत आहेत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ,झाशीची राणी लक्ष्मीबाई,अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी तसेच अलिकडच्या काळातल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,किरण बेदी,मीरा बोरवणकर,पूजा ठाकूर,अंजू जॉर्ज,सानिया मिर्झा आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल याबरोबरच रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोल पंपावर काम करणे, पत्रकारिता ही कामे महिला करु लागल्या आहेत.
स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यास आहे.
हमसे है जमाना सारा
हम जमाने से कम नही,
Girls the best जानलो बात यह मानलो.
सरतेशेवटी एवढंच म्हणेल.....
स्त्रियांना समानता मिळावी म्हणून स्त्रिया लढा देतच आहेत. त्यात त्यांना सपोर्ट करणें, कृतिद्वारें साथ देणें, हें पुरुषांचें कर्तव्यच आहे, आणि तें त्यांनी पाळायलाच हवें. त्याचबरोबर, एकीकडे समाजाशी लढत असतांना, आपल्याच ‘गटातील’ इतरांना (म्हणजे अर्थातच अन्य स्त्रियांना ) , आपण स्वत: ‘फेअर ट्रीटमेंट्’ ( fair treatment ) देणें हेंच योग्य आहे, याचें भान महिलांनी सुटूं न देणें श्रेयस्कर आहे.
‘महिला दिन’ प्रत्यक्ष साजरा करा अथवा करूं नका, पण समाजातील पुरुष व स्त्री या दोन्ही घटकांनी ‘fair treatment’ चा मंत्र सदैव ध्यानात ठेवणें मात्र गरजेचें आहे. तोच समाजसुधारणेचा गाभा आहे.

रा_दीप कठाळे 

No comments:

Post a Comment