Tuesday, 20 June 2017

Vaari आणि तरुण

मनी विठू गान, पावसाचे दान,
पायी पंढरीची वाट, तरुणाई चालते”

नव्या पिढीच्या अभंगाचे बोल आहेत हे !
गेल्या काही वर्षापासून तरुण पिढी आषाढातील पंढरपूरच्या पायी वारीकडे आकर्षित झालेली दिसते. खास करून ज्यांच्या घरी वारीची परंपरा नाही, अशी तरुण मंडळीदेखील काहीशा कुतूहलाने, काही भक्तीने, काही अगम्य मनःशांतीच्या ओढीने पंढरपूरची वाट चालताना दिसते आहे. यात ग्रामीण, शहरी अशा दोन्हीचा समावेश आहे. वारी आता केवळ शेतकरी, कष्टकरी किंवा ग्रामीण वारकऱ्यांची अशी राहिलेली नाही, त्यात आता मुंबई, पुण्यासारख्या शहरातील लोकही अतिशय उत्साहाने आणि शिस्तीने सहभागी होताना दिसतात.
वारीला जाण्याची प्रत्येकाची प्रेरणा निरनिराळी असते; कोणी श्रद्धेपोटी, कोणी मनःशांतीसाठी, कोणी पंढरीच्या वारीचा इतिहासाचा, व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी, कोणी केवळ वारकऱ्यांची, विठूरायाची सेवा करण्यासाठी तर कोणी वारीमध्ये काही नवीन व्यवसाय देखील करून अर्थार्जन करण्यासाठी! माझ्या मते, कोणत्याही प्रकारे वारीशी संलग्न होणे म्हणजे विठूभक्तीची वाट चालाण्यासारखेच आहे. आजची तरुणाई देखील याला अपवाद कशी असेल?   जीन्स- टीशर्ट, पाठीवर बॅक, गळ्यात डीजीटल कैमेरा अशा रूपात अनेक तरुण मंडळी सध्या आषाढवारी करताना दिसतात. अर्थात त्याकरिता पूर्ण पंढरपूरपर्यंत चालले पाहिजे असे नाही तर अनेक जण केवळ विकेंडला आपल्या सोयीने यात सहभागी होताना दिसतात. यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी, आयटीमधील तरुण मंडळी देखील सहभागी होताना दिसतात. चक्क ‘आयटी दिंडी’ सुद्धा वारीत गेल्या काही वर्षापासून आहे.
सोशल मीडिया मुळेच वारी जास्त तरुणांपर्यंत पोहोचली. आजची तरुण मंडळी, यात विद्यार्थी, नोकरदार दोन्हींचा समावेश आहे, जे वारीपुर्वी त्याबद्दल इंटरनेट साईट्सवरून माहिती गोळा करतात, अभंग ऐकतात, संतपरंपरेबद्दल, दिंडीबद्दल वाचतात. या निमित्ताने त्यांना आपल्या समृद्ध संतपरंपरेची ओळख देखील नव्याने होते आहे आणि त्यांना एका अनामिक ओढीची देखील जाणीव होते आहे, जी इंटरनेट, मोबाइल फोन, चॅटींग यामध्येच नाही! तर वारीमध्ये चालत असताना एकमेकास ‘माउली’ असे हाक मारणे देखील अतिशय जिव्हाळा आणि आपलेपणा निर्माण करणारे आहे. वारीमध्ये सहभागी होणे हे केवळ वारीचे अतिशय कलात्मक फोटो काढणे, फेसबुक अथवा ट्वीटरवर अपडेट करणे, इतकंच याचं स्वरूप मर्यादित नाहीये. तर, वारीचा भव्यपणा, वारकऱ्यांमधील शिस्त, वारीचं व्यवस्थापन, त्यासाठीची बांधिलकी, कमिटमेंट हे सगळच विठूमाऊली इतकंच ओढ लावणार आहे. बहुदा म्हणूनच हळूहळू पंढरीची वारी तरुणाईमध्ये एक आकर्षण बनली. हेही मान्य केले पाहिजे की आज सोशल मीडिया, न्यूज तरुणाईच्या सहभागाला कवरेज देवून एक प्रकारे प्रोत्साहन देते आहे. देवाच्या ओढीने इतके पायी चालत जाण्याची जी ताकद येते ती भक्तीभावामुळेच येते असं वारकरी सांगतात. या वारीतून हेच आजची तरुण पिढी शिकत आहे की जर प्रचंड मेहनत करायची जिद्द असेल, सर्व शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ताकद पणाला लावायची तयारी असेल तर आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचता येतं! या संकल्पातून देशाची बळकट नवीपिढी निर्माण होतेय, जी या वारीतून सेवाकार्याचा महत्व जाणून घेतेय ही लाखमोलाची बाब आहे.
काहींना तरुणाईचा वारीतील टेक्नो-सहभाग हे एक फॅड वाटतो. पण, याकडे केवळ टीकात्मक वृत्तीने न पाहता सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणं आवश्यक आहे. मला वाटत की ही तरुणाई एका अतिशय सकारात्मक सद्संगतीत जाते आहे. पूर्वी संतांनी जनतेला व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी, परमार्थाची ओळख करून देण्यासाठी म्हणून अभंग रचले, देवाबद्दल गोडी उत्पन्न केली, काही अंशी धार्मिकपणा वाढीस लावला. आजच्या क्लब-पबमध्ये रमणाऱ्या तरुण पिढीला पुन्हा या साऱ्याची गरज आहे. त्यांच्यामधला संवाद वाढेल, त्यांना आपली संस्कृती माहिती होईल, जपता येईल, मनःशांती मिळेल, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. अशावेळी, ही पंढरीची वारी नक्कीच काही परिवर्तन करू शकेल. महाराष्ट्राची संतपरंपरा काही अंशी का होईना पण नक्कीच पुढे चालत राहील.
आता पंढरपूरला पायी चालत जाणे इतकीच यातील तरुणाईच्या सहभागाची व्याप्ती राहिलेली नाही तर आता ठिकठिकाणी तरुण मंडळी यात वारकऱ्यांची अनेक प्रकारे सेवा करताना दिसतात. कॉलेजमध्ये
 एन. एस. एस., एन. सी. सी. अशा उपक्रमांमुळे, विविध गणेशमंडळांमधील उपक्रमातील सहभागामुळे आजच्या तरुण पिढीला सामाजिक कार्याचे भान येवू लागले आहे. तरुण पिढी आज अतिशय शिस्तबद्धपणे सोशल मीडियाच्या मदतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवताना दिसते. यात वारीच्या वाटेवरील गावांमधून पाण्याची सोय करणे, अन्नदान, स्वच्छता, मोबाइल चार्जिंग, तसेच आरोग्यसेवा अशा अनेक स्वरूपात तरुणाई सेवा करताना दिसते आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच विठूरायाची सेवा’ हा भाव अनेक तरुण मंडळींच्या सेवेमध्ये दिसून येतो. आणि नकळत वारीतील तुळशी वृन्दावनाला हात जोडले जातात. 

तुमचा 
#दिपक कठाळे 

Saturday, 10 June 2017

अजब असा भैरवगड .....

भैरवगड केवळ थ रा र क!
 मु.पो.(मोरोशी) ता.मुरबाड ,जिल्हा.ठाणे 


हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी खोली, सकाळी अकरा वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार! त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्‍या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट! त्या भिंतीखाली थोडंस मोकळं पठार, त्याखाली बर्‍यापैकी उताराच्या वाटा आणि पायथ्याला वळसा मारून माळशेजकडे जाणारा कल्याण-नगर रस्ता! - भैरवगड या वर्णनापेक्षाही अधिक काहीतरी आहे!
   घरी निवांत सुवर्णपिंपळ नावच पुस्तक वाचत होतो. तेवढ्यात श्री.खरमाळे सर (माजी सैनिक) यांचा फोन आला. दिपक कुठे आहेस तु येतोस का ? जाऊयात भटकंतीला ...मी होकार्थी उत्तर दिल आणि ट्रेकिंग करताना अडचण होणार नाही असे कपडे घातले. (हे पण पहावं लागत नाहीतर चांगल्या चांगल्यानंच्या पँटी फाटल्यात) सरांकडे गेलो आणि पाहतोय तर काय आमच्या सौ.खरमाळे मॅडम (पूर्वीच्या गुंजाळ मॅडम कॉलेज मध्ये मला मराठी विषयाला होत्या.) नर्व्हस होत्या कुठे तरी जायचं होत पण सर काही राजी होत नव्हते असो. पण आम्हाला जायचे होते ठरलेल्या ठिकाणी आणि अचानक सर म्हंटले चल भैरवगड . मी हि आतुर होतो जाण्यासाठी ,मॅडम हि तयार झाल्या मात्र आता मॅडम हसत होत्या . सुशांत ला फोन केला येतोय का ? तोही आला. आम्ही सर्व निघालो जुन्नर - मढ - माळशेज घाट - मोरोशी असा मार्ग निश्चित होता . (दुसरा मार्गच नाही ) खूप मजेशीर गप्पा मारत आम्ही जात होतो. माळशेज घाट उतरून मोरोशी च्या अलीकडे जांभुळ , आवळा विकणारे दिसले. मॅडम म्हंटल्या किती छान जांभळ आहेत ते घेण्यासाठी मागे फिरले. सुशांत आणि मी पुढे गेलो आणि तिथेहि एक जोडपं जांभुळ विक्री करत होते. तिथे बसलो थोडी विचारपूस केली. सरांनी आधी थांबवून भैरवगड दाखवला होता. माझी त्याच्या कडे सारखी नजर जायची. भोकाडी बाबा सारखा वाटायचा. अक्राळ विक्राळ सारखा हसतोय आणि ये ये अस म्हणतोय असा भास वाटायचा. शेवटी मोरीशी आलं. आश्रम शाळेच्या समोर एका घरासमोर एक आजोबा दिसले त्यांना विचारण्यासाठी पुढे सरसावलो तर आजोबांच्या मिशा एखाद्या हरियानाच्या पहिलवाना सारख्या ताव दिलेल्या होत्या. आजोबा सांगायला लागले कुठून कशी वाट जाते.आजोबांची परवानगी घेऊन गाड्या तिथेच पार्क केल्या. वेळ कमी होता म्हणून पटापट आम्ही चौघे निघालो. आंब्याची मोठं मोठी झाड होती. घाली पडलेला आंबा दिसला. मी घेतला पण काय माहित हा कातळात उभा असणारा भैरोबाबा मला रिशवत देत होता आणि मी आंब्याची चव चाखत चाखत चाललो होतो. मस्त अशी प्रतिक्रिया दिली. पण पुढे काय मांडलंय माहिती नव्हत 

एक लक्षात आलं सुख भोगलं कि दुःख येते आणि दुःख भोगलं कि सुख. मी सध्या सुख चाखत होतो , दुःख येणार होत हे अटळ होत. चालणे मात्र कोणीच थांबवलं नव्हत. मध्ये सैराट सिनेमा मध्ये दाखवल्या सारखे झाड दिसले सुशांत आणि मॅडम दोघेही बोलले दीप्या जा झाडावर फोटो काढतो मी ऐटीत झाडावर गेलो पण उतरता कुठे येतंय झालो ना पंक्चर कस बस सुशांतचा आधार घेऊन उतरलो. पुढे सर बरेच पुढे गेले होते. मॅडम थकल्या होत्या हे सरांनी ओळखल काही अंतरावरच गड होता. सरांनी मॅडमला इथेच थांब अस सांगितलं पण अनोळखी जागा असल्याने बरोबरीला कोणी तरी हवं यासाठी सर म्हंटले कोण थांबतय. मी नाही म्हंटलो राहिला सुशांत त्याला थांबावच लागलं. सर आणि मी पुढे मार्गस्थ झालो पुढे पुढे अस वाटायला लागलं आयला उगाच आलो मी थांबलो असतो तर बर झालं असत पण सरांच्या पावलावर पाउल ठेवत अविरत चालत राहिलो .
 भैरवबाबा भसकन अंगावर आलाय अस वाटत होत खूप भीती वाटत होती पण सर बरोबर होते. मी पण पुरता थकलो होतो. गडाच्या अगदी पायथ्याला दोन गावकरी मुले शिकारीला टेहळणी साठी बसले होते अन्य गावकरी खाली होते आणि दोघे तिघे भाला,कोयता घेऊन जंगलात शिकारीसाठी गुसले होते. थोडा वेळ त्या मुलांजवळ आम्ही दोघे बसलो. गडाबाबतीत विचारपूस केली. त्या मुलांनी सांगितलं पहिलं अवघड आहे एक पायरी अस म्हंटल्यावर मी वर बघितलं. आता सरांना नाही पण म्हणता येत नव्हतं (नाईलाज होता)
सर म्हंटले पुढे तू चल मी एक एक पायरी चढत होतो आणि अचानक एक खांद्या एवढ अंतर असलेली पायरी लागली आणि खाली सटकला तर मोडतोड नक्कीच पण कधीच न बरी होणारी पण माझे शर्थीचे प्रयत्न चालू होतेच.पाठीमागून सर आले. मला क्रॉस करून पुढे जाऊन हँड ग्रीप दिली. पाय नुसते लटलट कापत होते.
" आता मात्र भैरवबाबा हसल्याचा आवाज मला येत होता. आणि म्हणत होता दिपकराव यालाच तर जीवन म्हणतात. तुम्ही येताच मी तुम्हाला गोड आंबा दिला म्हणजे सुख आणि आता जी कसरत करताय ना पाय लटलट कापतायत ना त्याला म्हणतात  दुःख " हे सर्व मनातल्या खेळाचे शब्द होते
थोडं पुढे नाही जात तर लगेच खालच्या पायरी पेक्षा मोठ अंतर असलेली पायरी ....पायरी कसली हात सुटला कि हाड वेचावी लागतील अशी भयानक जागा होती . मी पुढे जायच नाही असा निर्णय घेतला आणि सर पुढे गेले बराच वेळ झाला सर खाली येत का नाही. मनातच बोललो ...... चुकले कि काय कुठे देवा भैरवा दृष्टा काय रे चेष्टा करतो. मी खाली हळूहळू उतरत होतो.
वार इतकं होत कि छोटे छोटे दगड खाली पडले कि हवेत तरंगत खाली पडायचे. हे पाहून तर अजून पाय लटलट कापायचे. कसा बसा खाली आलो. थोड्याच वेळात सरांचा आवाज आला.

मन शांत झालं भैरवबाबा कडे पहिले त्याने डोळा मारल्याचा भास झाला आणि मी हि मिश्किलपणे गालातल्या गालात हसलो. संध्याकाळचे सहा वाजले होते. अंधार पडायच्या आत खाली जायचे होते दाट झाडी होती खाली सुशांत आणि मॅडम आमची वाट पाहत होते. आम्ही पुढे पुढे जात असताना अचानक मॅडम आवाज आणि इशारा करत होत्या .पुढे येऊ नका दरी आहे दरी ..........सुशांतने मला फोन केला आणि सूचना केली. everyone will walk either behind us or in front of us असं सोप्पं सूत्र आहे!   आम्ही तिरप्या वाटेने खाली उतरण्यासाठी निघालो. पुढे आम्ही चौघे गाड्या जिथे लावल्या होत्या तिथे आलो. सरांनी त्या आजोबांना पैसे दिले. पण जगातला सर्वात सुखी माणूस मला त्या आजोबांमध्ये दिसला. पैशाचा काडीमात्र लोभ नाही. आजोबांचा निरोप घेतला
त्या आधी मी परत एकदा भैरवबाबाकडे पहिले तर ......
डोळ्यासमोर खड्यापारधी सारख रूप दिसलं. माळशेजच्या डोंगररांगांचा राखवालदारच दिसला.
पाहून हसलो आणि घरच्या वाटेन मार्गस्थ झालो.
अशा ट्रेकहून आलो की नेहमीच वाटतं, की 'दिवस चांगला गेला' याचा भटक्यांच्या प्र'चलित' शब्दकोशातला अर्थ असल्या अनुभवांपेक्षा अजून वेगळा काही असेल का ?

 (अवांतरः अनुभवांती असे वाटते की, नवख्या ट्रेकरला चढ/उतरताना दिली गेलेली त्याच्या दृष्टीने सर्वात भीतीदायक सूचना ही आहे - "तू जिथे हात ठेवला आहेस तिथे पाय ठेवायला हवा होतास!"

तुमचा
 दिप्या