Wednesday, 8 March 2017

महिला दिन का ? दीन


हल्ली जागतिक पातळीवर निरनिराळे दिवस साजरे केले जातात. या सर्व दिवसांना वेगवेगळे विषय नेमून दिलेले आहेत. बालक दिनापासून ते ज्येष्ठ नागरिक दिनापर्यंत तसेच आई वडिलांच्या दिनापासून ते डॉक्टर नर्स दिनापर्यंत सारेच दिवस आपण साजरे करत असतो. सध्या आपल्या देशात महिला वर्गाला सोनियाचे दिवस येत आहेत. त्यामुळेच जागतिक महिला दिन आपण मोठ्या "ममतेने" साजरा करत आहोत. शीला दिक्षीतांपासून मायावतीपर्यंत व सुषमा स्वराजपासून
 माननीय प्रतिभाताईंपर्यंत महिलांची कर्तबगारी राजकारणासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रातही नजरेत भरत आहेत. स्थानिक राजकारणात तर आपल्याकडे महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने हा महिलावर्ग प्रकाशात येत आहे. महाराष्ट्रात महिला बचत गटांची मोठी साखळी उभी रहात असून ग्रामसुधार योजनेपासून ते स्वावलंबी बनण्यापर्यंत जिद्दीने स्त्रीवर्ग पुढे येत आहे. या स्त्रीयांच्या जीवनात नुकते कुठे प्रकाशाची एक ज्योत उजळते आहे. पहाट उगवलेली आहे आणि महिलांच्या कर्तबगारीचा सूर्य अजूनही डोंगराआडून बाहेर पडायचा आहे. पण महिलांच्या आंधारमय युगात हळूहळू झुंजूमुंजू होत आहे ही एक चांगली घटना आहे. सावकारी बंद करण्यापासून ते गावात दारुची बाटली आडवी करुन आपला संसार सुखाचा करण्यापर्यंत महिलांची आघाडी काम करत आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीच्या कामात आजही महिलांचे कार्य मोठे आहे. उत्तरेत चहाच्या मळ्यापासून ते दक्षिणेत रबराच्या शेतीपर्यंत तर महाराष्ट्रात फळे व कापूस वेचण्यापासून ते ऊसतोडीपर्यंत स्त्रीवर्गाचे कार्य विशेष आहे. मुलाबाळांना सांभाळत घरकाम करत या स्त्रीया शेतावरही राबत आहेत. शहरी व नागरी भागात शिकविण्याच्या शाळेपासून ते संशोधन केंद्रातील प्रयोगशाळेपर्यंत या माता भगिनी काम करताना आढळतात. बॅंकींग व कॉर्पोरेट क्षेत्रातही काही कर्तबगार महिला कार्यरत आहेत. पोलिसदलापासून ते सैन्य दलापर्यंत स्त्रीवर्गाच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत. म्हणजेच सध्या असे कोणतेच क्षेत्र बाकी राहिलेले नाही की जेथे या स्त्रीया नाहीत. लोकसंख्येत निम्मा वाटा स्त्रीयांचा आहे आणि स्त्री-पुरुष सर्वांनाच समान हक्क घटनेने दिल्यामुळे स्त्रीयांची प्रगती होत आहे. हे सारे जरी खरे असले तरी देवीस्वरुप म्हणून भारतीय समाज ज्यांची पूजा करतो त्या सर्वच माता भगिनींचे आयुष्य सुखाचे आहे असे नव्हे. कुटूंबात आणि समाजात जेवढा मान सन्मान मिळावयास हवा तेवढे भाग्यही त्यांच्या नशिबी नाही. पुरुषप्रधान व्यवस्था राबविणारा भारतीय समाज आजही आपल्या परंपरागत मानसिकतेतून बाहेर येण्यास तयार नाही. जन्मापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत तिला समाजाने रुढी व परंपरेच्या बेड्यात अडकवून ठेवलेले आहे. आजही समाजात स्त्री सुरक्षित राहिलेली नाही. स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल विविध कायदे करण्यात आले. सती बंदीपासून ते अगदी शारदा कायदा व हुंडा प्रतिबंध कायदा केला तरी महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. आरुषी हत्या व भॅंवरीदेवी हत्या या अगदी आताच्या घटना आहेत. जेसिका लाल केस व तंदूरी केस आता जनता विसरत चाललेली आहे.
भारतातील बर्‍याच शहरात आजही स्त्री रात्री निर्धोकपणे फिरू शकत नाही. ज्यांनी कायदा राबवायचा असे नेते व पोलिस यंत्रणाच महिलांवर अत्याचार करण्यास धजावतात याचा अर्थ वेगळा काय असणार? स्वातंत्र्य मिळून साठ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला पण तरीही हा वर्ग अजूनही अबलांचा वर्ग म्हणूनच ओळखला जातो. खोट्या प्रतिष्ठेसाठी जन्मदाता पिताही आपल्या लेकीचा गळा घोटतो हा अहंकार कोणता? कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होणे आपल्या देशात कठीण होत चाललेले आहे. सार्‍या देशातच स्त्रीयांचे लोकसंख्येतील प्रमाण वेगाने घसरत चाललेले आहे. स्त्रीभ्रूण हत्या हा मोठा प्रश्न देशापुढे उभा आहे. त्याचबरोबर महिलांवरील वाढते अत्याचार आजही थांबलेले नाहीत. एकूण होणार्‍या आत्महत्यांमध्ये महिलांच्या आत्महत्या संख्येने जास्त आहेत. घरच्या लोकांचा त्रास सहन न झाल्याने ब-याचजणी आपले जीवन आपल्याच हाताने संपवतात. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्रास सहन करीत बर्‍याच महिला केवळ संसार आणि मुलाबाळांकडे बघून तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहेत. दररोजचे वर्तमानपत्र उघडले तरी आपल्याच राज्यातील अत्याचाराच्या बातम्या वाचून आपले राज्य सर्वात प्रगत आहे का संशय येतो. संपूर्ण महिला वर्गाला समाजात सन्मानाने जगता येईल व सारे हक्क न मागता मिळतील असा सुदिन केंव्हा उजाडेल हे आजही सांगता येत नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी वैगेरे लिहायला ऐकायला बरे वाटते पण प्रत्यक्षात काय आहे? इतर दिवसांसारखा जागतिक महिला दिन फक्त उपचार न राहो.

#तुमचा 
दिपक